DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Gurudev Rabindranath Tagore Quiz

रवींद्रनाथ टागोर : प्रश्नमंजुषा 
Gurudev Rabindranath 
Tagore Quiz
********************************
❀ ७ मे ❀
कवी सर रवींद्रनाथ टागोर जन्मदिन
जन्म - ७ मे १८६१ (कोलकाता)
स्मृती - ७ ऑगस्ट १९४१ (ठाकूरबारी,कोलकाता)

"जन गण मन" या राष्ट्रगीताचे जनक !
    रवींद्रनाथ टागोर ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, हे एक ब्राह्मोपंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगालीकवी, संगीतकार होते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते होते.
    कोलकात्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या रवीन्द्रनाथांनी वयाच्या ८व्या वर्षी पहिली कविता लिहिली. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपणनावाने बऱ्याचशा कविता लिहिल्या. शांतिनिकेतनची उभारणी, विस्तृत व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती व रवीन्द्रसंगीताचे सृजन हे रवीन्द्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होय. रवीन्द्रनाथांनी रचलेली जन गण मन व आमार शोनार बांग्ला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवीन्द्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत. पारंपरिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते या विचारातून शांतिनिकेतनाचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला.
 
    कोलकात्याच्या जोराशंका ठाकूरबारी येथे रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म झाला. वडील देवेन्द्रनाथ टागोर व आई शारदा देवी यांच्या १४ अपत्यांमध्ये रवींद्रनाथ हे १३वे. ११व्या वर्षी रवींद्रनाथांनी वडिलांसोबत १४ फेब्रुवारी १८७३ रोजी भारत भ्रमणार्थ कलकत्ता सोडले. या भ्रमंतीत त्यांनी विविध ठिकाणे पाहिली. वडिलांची शांतिनिकेतन येथील मालमत्ता, अमृतसर व हिमालयातील थंड हवेचे ठिकाण, डलहौसी इत्यादी. येथे रवींद्रनाथांनी विविध व्यक्तींची आत्मचरित्रे वाचली, इतिहास, खगोलशास्त्र, विज्ञान , कालिदासाचे काव्य व संस्कृत आदींचे अध्ययन केले.
    १८७७ साली प्रकाशित झालेल्या रचनांमुळे रवींद्रनाथ प्रथम लोकांसमोर आले. यात मैथिली कवीच्या विद्यापती प्रवर्तितशैलीत रचलेल्या काही दीर्घ कविता होत्या. विनोदाने रवींद्रनाथांनी प्रथम ह्या भानुसिंह नामक वैष्णव कवीने १७व्या शतकात रचलेल्या व नंतर गहाळ झालेल्या रचना आहेत, असा आविर्भाव केला व नंतर त्यांचे कवित्व मान्य केले. याच काळात त्यांनी संध्या-संगीत, बंगाली भाषेतील पहिली लघुकथा 'भिकारिणी' व सुप्रसिद्ध कविता 'निर्झरेर स्वप्नभंग' आदी रचना लिहिल्या.
 
    बॅरिस्टर होण्यासाठी त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज येथे प्रवेश घेतला, परंतु १८८० मध्ये कोणत्याही पदवीशिवाय ते बंगालला परतले. ९ नोव्हेंबर १८८३ रोजी त्यांनी मृणालिनी देवी यांच्याशी विवाह केला. या विवाहापासून त्यांना पाच अपत्ये (पैकी दोघांचा बालमृत्यू) झाली. १८९० साली रवींद्रनाथांनी सध्याच्या बांग्लादेशातील सियाल्दा येथील टागोर घराण्याची मालमत्ता सांभाळण्यास सुरुवात केली. त्यांची पत्‍नी व मुले १८९८ साली येथे त्यांच्या सोबत आली. या काळात ते जमीनदार बाबू या नावाने ओळखले जात होते. हा काळ रवींद्रनाथांचा 'साधना काळ' म्हणून ओळखला जातो. त्यांनी नंतर 'गल्पगुच्छ' नावाचा ८४ कथा असलेले तीन खंडी पुस्तक प्रकाशित केले. आवेग व विरोधाभासयुक्त असे ग्रामीण बंगालचे सुरेख चित्र यात रवींद्रनाथांनी रेखाटले आहे.
 
    १९०१ साली रवीन्द्रनाथ सियाल्दा सोडून शांतिनिकेतन येथे राहण्यास आले. एका आश्रमाची स्थापना करणे हा त्यांचा उद्देश होता. या आश्रमात त्यांनी एका प्रार्थना-गृहाची, प्रयोग-शील शाळेची, बागबगिचा व ग्रंथालयाची स्थापना केली. रवीन्द्रनाथांच्या पत्‍नीचा व दोन मुलांचा मृत्यू येथेच झाला. वडिलांचे देहावसान १९ जानेवारी १९०५ ला घडले व वारसदार म्हणून रवींद्रनाथांना नियमित मासिक उत्त्पन्न मिळू लागले. याशिवाय त्यांना त्रिपुराच्या महाराजांकडून आर्थिक साहाय्य, कौंटुबिक दागदागिने व पुरी,ओडिशा येथील बंगला विकून काही प्राप्ती झाली. या काळात त्यांचे साहित्य बंगाली व विदेशी वाचकांचे आधिकाधिक लक्ष खेचू लागले होते. नैवेद्य व खेया या रचना या काळात प्रकाशित झाल्या. याशिवाय कवितांचा free verse या नावाने अनुवाद करणेही सुरू होते. १४ नोव्हेंबर १९१३ रोजी स्वीडिश अकादमीचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाल्याची बातमी रवीन्द्रनाथांना समजली. गीतांजली या रचनेबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. गीतांजलीचे भाषांतर स्वतः रवीन्द्रनाथांनीच केले होते. १९१५ साली त्यांना ब्रिटिश सरकारने 'सर' ही पदवी दिली. १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी ती सरकारला परत केली.
 
    १९२१ साली रवीन्द्रनाथ व कृषी-अर्थतज्ज्ञ लिओनार्ड के एल्महिर्स्ट् यांनी शांतिनिकेतन जवळील सुरुल येथे एका ग्रामीण पुनर्निर्माण संस्थेची स्थापना केली. याच संस्थेचे रवीन्द्रनाथांनी पुढे 'श्री-निकेतन' असे नामकरण केले. श्री-निकेतनच्या माध्यमातून महात्मा गांधींच्या प्रतिकात्मक स्वराज्य चळवळीला पर्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. ज्ञानसंवर्धनातून अज्ञानी व असहाय्य ग्रामीण भागाची सुटका होईल या उदेशाने त्यांनी विविध देशातील विद्वान, दाते व अधिकाऱ्यांस या उपक्रमात सहभागी करून घेतले १९३० सालापासून त्यांनी भारतातील पराकोटीच्या जातीयतेविरुद्ध प्रचार सुरू केला. नाट्य-कविता यांद्वारे जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. केरळच्या गुरुवायुर मंदिरात दलितांना प्रवेश देण्यासाठी त्यांनी आवाहन केले.
 
    जीवनाच्या शेवटच्या दशकात रवींद्रनाथ पूर्णपणे जनसन्मुख होते. त्यांची लोकप्रियता विशेषतः बंगालमध्ये शिखरावर होती. १५ जानेवारी १९३४ रोजी बिहारमध्ये झालेल्या भूकंपाची, महात्मा गांधींनी 'दलित अत्याचाराचा परमेश्वराने घेतला सूड' अशी संभावना केली. या वक्तव्याचा रवींद्रनाथांनी निषेध केला. बंगालच्या आर्थिक व सामाजिक अवनतीबाबत व कोलकत्यातील भयावह दारिद्रया बद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या दारिद्र्यावर केलेल्या मुक्तछंदातील १०० ओळींच्या कवितेचा प्रभाव सत्यजित रे यांच्या अपुर संसार (अपूचे जग) या चित्रपटावरही पडलेला दिसतो. पुनश्च, शेष सप्तक, पत्रपुत आदी गद्यपद्यांचा समावेश असलेले स्वतःच्या लिखाणाचे १५ खंड संपादित केले. याशिवाय चित्रांगदा, श्यामा, चंडालिका या सारख्या नृत्य-नाटिकांवर विविध प्रयोग केले. याशिवाय दुई बोन, मलंच, चार अध्याय आदी कादंबऱ्या लिहिल्या. 
    अखेरच्या काळात विज्ञानात रवींद्रनाथांनी विशेष रस घेतला. यातूनच त्यांच्या विश्वपरिचय या निबंध संग्रहाची निर्मिती झाली. जीवशास्त्र, भौतिकी व खगोलशास्त्राचा त्यांनी केलेल्या अभ्यासाचा प्रभाव त्यांच्या कवितेवरही जाणवतो. त्यांच्या कवितेतून झळकणारा निसर्गवाद हा त्यांना वैज्ञानिक नियमांप्रती त्यांना असलेला आदर अधिरेखित करतो. विज्ञानाची प्रगती त्यांनी आपल्या विविध रचनांमधून मांडली आहे- जसे से (तो), तीन संगी, गल्पस्वल्प.
 
    रवींद्रनाथांच्या आयुष्यातील शेवटची चार वर्षे प्रदीर्घ व्याधी व आजारपणांनी व्यापली. १९३७ साली शुद्ध हरपून ते बराच काळ कोमात होते. पुन्हा १९४० सालचा कोमा जीवघेणा ठरला. या शेवटच्या काळात लिहिलेल्या काव्यरचना रवींद्रनाथांच्या काव्यरचनांत सर्वश्रेष्ठ मानण्यात येतात. त्यांचे मृत्युविषयक चिंतन या रचनांतून प्रकटते. ७ ऑगस्ट १९४१ रोजी रवींद्रनाथांचा कोलकात्याच्या त्यांच्या वडिलोपार्जित जोरशंका ठाकूर बाडी येथे मृत्यु झाला.
कादंबऱ्या व इतर साहित्य :
रवींद्रनाथांनी चतुरंग, शेषेर कबिता, चार अध्याय, नौका डुबी, घरे बाईरे या सारख्या ४ लघुकांदबऱ्या व ८ मोठ्या कादंबऱ्या लिहिल्या. 'चतुरंग' ही सचिश नावाच्या परस्परविरोधी संकल्पनांत अडकलेल्या पात्राची कहाणी आहे. धार्मिक गूढतेतून आयुष्याचा अर्थ शोधणाऱ्या कथानायकाचा अंती होणारा भ्रमनिरास टागोरांनी या कादंबरीतून मांडला आहे.
 
'गोरा' कांदबरीतील मुख्य पात्र पारंपरिक हिंदू सनातनी मताचे समर्थक आहे. ह्या गौरवर्णीय पात्र व इतर पात्रातील संवादातून ही कांदबरी उलगडत जाते. सनातनी गोराच्या विचारामुळे त्याचे सनातनी वडील प्रभावित होत नाहीत. धर्मांधता ही श्रद्धेमुळे नव्हे तर व्यक्तीच्या उग्र प्रकृतीने बनते असे टागोर या कादंबरीतून सांगतात.
    'शेषेर कबिता' ही कवितेने नटलेली कादंबरी. यात 'रवींद्रनाथ ठाकूर' हे स्वतःचेच नाव सांगणाऱ्या 'प्रसिद्ध कवी' वर त्रयस्थपणे टीका करतात. 'चार अध्याय' ही रवींद्रनाथांची शेवटची कांदंबरी. 'राष्ट्रभक्ती' म्हणजे काय?, राष्ट्र कसे बनते?, केवळ घोषणाबाजी, कठोर शिस्त यातून खरे स्वातंत्र्य शक्य आहे काय? अशा प्रश्नांचा धांडोळा ही कादंबरी घेते.
    रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितलेल्या बालपणा पासूनच्या आठवणी त्यांव्या ’जीवनस्मृती’ या पुस्तकात आहेत. पुस्तकाचा मराठी अनुवाद नीलिमा भावे यांनी केला आहे.
 
    रवींद्रसंगीत :
    रवींद्रनाथांनी रचलेल्या व चाल दिलेल्या जवळपास २२३० गीतांना एकत्रितपणे रवींद्रसंगीत असे संबोधले जाते. 'गगनेर खाले रबि चन्द्र दीपक ज्बले' हे रवींद्रनाथांनी रचलेले पहिले व 'हे नूतन देखा दिक आरो बारो' हे शेवटचे गीत मानण्यात येते. 
    भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते असलेल्या 'जन गण मन' व 'आमार शोनार बांग्ला' या रचना मूलतः रवींद्रसंगीताचा हिस्सा आहेत.
    रवींद्रसंगीतातील गीते ही विविध रागांमध्ये बांधण्यात आली असून रागाचा व गीताचा भाव यात सुसंगती असते. अनेक गीतांमध्ये विविध रागांना एकत्र बांधून नवसृजन केलेले दिसते. अभिजात भारतीय संगीतातून प्रेरणा घेतलेल्या रवींद्रसंगीत हे नंतर अनेक अभिजात भारतीय संगीताच्या गायकवादकांचे प्रेरणास्रोत ठरले. रवींद्रसंगीताने प्रभावित गायक-वादकात विलायत खान (सतार), अमजद अली खान (सरोद]) आदींचा समावेश आहे.
चित्रकला :
    वयाच्या ६० च्या वर्षी रवींद्रनाथांनी चित्रे काढण्यास सुरुवात केली. द. फ्रान्स मधील कलाकारांच्या प्रेरणेवरुन त्यांच्या चित्रांची पॅरिस मधील पहिल्या प्रदर्शनासह युरोपभर अनेक प्रदर्शने झाली. सौन्दर्यदृष्टी व रंगछटांमध्ये रवींद्रनाथांच्या चित्रशैलीची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. रवींद्रनाथांनी रचनेत वेगवेगळ्या शैलींचे अनुसरण केले. यात उत्तर आयर्लॅड मधील मलनगान कारागिरीपासून कॅनडाच्या हैदा कोरीवकाम प्रकारापर्यंतच्या चित्र व शिल्पकलेतील शैली येतात. आपल्या कृतींची हस्तलिखितेही अनेकदा रवींद्रनाथांनी कलाकारीने सजवली आहेत.
 
    नाट्य :
    वयाच्या विसाव्या वर्षी रवींद्रनाथांनी 'वाल्मिकी प्रतिभा' नावाचे पहिले नृत्य-नाट्य लिहिले. यात भजनांच्या स्वरूपात असलेले पारंपरिक बंगाली कीर्तन व युरोपीय गीत-शैलींचा संमिश्र वापर केला आहे. ऐहिक सुखोपभोगांपासून पारमार्थिकाकडे हा विषय डाकघर नावाच्या नाटकात रवींद्रनाथांनी हाताळला आहे. 'अभिनयापेक्षा भावनांवर भर' असे रवींद्रनाथ स्वतःच्या नाटकांचे वर्णन करतात. चंडालिका, विसर्जन, चित्रांगदा, राजा, 'मायार खेला ही रवींद्रनाथांची इतर नाटके. नाटकांसोबत टागोरांच्या 'नृत्य-नाटिका' विशेष प्रसिद्ध आहेत. मणिपुरी शैलीच्या अभिजात नृत्य शैलींचा टागोरांनी वापर केला आहे.
लघुकथा
    'गल्पगुच्छ' नावाचा रवींद्रनाथांचा ८४ लघुकथांचा ३ खंडी संग्रह प्रसिद्ध आहे. आजूबाजूचा परिसर, आधुनिक कल्पना व बौद्धिक कूटप्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न टागोर यांतून करतात. 'काबुलीवाला' या सुप्रसिद्ध प्रथमपुरुषी कथेत दूरदेशी असलेल्या आपल्या मुलीची आठवण कशी येत राहते हे अफगाण फळवाल्याच्या तोंडून टागोर सांगतात.
    इस्रायल मधील सार पब्लिशिंग हाऊस या प्रकाशन संस्थेने रविंद्रनाथांच्या कथांचा हिब्रू भाषेतील अनुवाद 'एप' या नावाने २००६ साली प्रकाशित केला.
संदर्भ : इंटरनेट
Please Solve Quiz 
सर्वांसाठी उपयुक्त प्रश्न मंजुषा 

 Special Day Quiz  

CLICK HERE 
 
CLICK HERE 
या आणि अश्या प्रकारच्या नवनवीन टेस्ट सोडविण्यासाठी दररोजची नवीन अपडेट माहिती मिळविण्यासाठी ब्लॉगला फॉलो Follow करा आमच्या खालील व्हॉट्सऍप चित्राला / लिंकला स्पर्श करून व्हॉट्सऍप ग्रुपला जॉईन होऊ शकता.
If you want new educational videos as well as quiz links under the 'Let's Learn Out of Book' initiative, you can join the following Social media Group.



Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon